मुंबई (प्रतिनिधी): उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जनता दल, शेकाप यांच्यासह डाव्या पक्षांचा सहभाग असलेल्या प्रागतिक पक्षांच्या आघाडीने स्वागत केले आहे.
शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावा ही आज एक परंपरा बनली आहे. तसेच याच पक्षाने या मैदानावर मेळावा घेण्यास परवानगी देण्याची मागणी मुंबई महापालिकेकडे प्रथम केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शिवसेनेला परवानगी नाकारणे अन्यायकारक होते. परंतु, न्यायालयाच्या निर्णयाने ही चूक दुरूस्त झाली असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा. एस. व्ही. जाधव तसेच मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख वा एका गटाचे नेते म्हणून या प्रश्नाचा विचार न करता, ते आज राज्याचे प्रमुख आहेत. त्या भूमिकेतून हा निर्णय स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

