ईएसआयसीने कामगारांच्या कल्याणाकडे लक्ष देत, त्यांना उत्तम दर्जाच्या सेवा देण्याचा प्रयत्न करावा- महासंचालक
नवी दिल्ली ( सौजन्य : पीआयबी ): तामिळनाडू केडरचे वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र कुमार यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील सरकारच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) च्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. याआधी ते केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान (MeiTY) मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली. ईएसआयसीने कामगारांच्या कल्याणावर भर द्यावा तसेच त्यांना सर्वोत्तम दर्जाच्या सेवा पुरवल्या पाहिजेत, ज्यामुळे समाजावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल, असे राजेंद्र कुमार या बैठकीत म्हणाले. तंत्रज्ञानात वाढ करत, देशभरात ते उपलब्ध करुन सेवा वितरण यंत्रणा सुधारण्यावर त्यांनी भर दिला.
डॉ. राजेंद्र कुमार यांना जिल्हा आणि राज्यस्तरीय संघटनांच्या कारभाराचा आणि व्यवस्थापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तमिळनाडू सरकारमध्ये त्यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि युवक कल्याण आणि क्रीडा विकास विभागांमध्ये प्रधान सचिव म्हणूनही काम केले आहे. डॉ. राजेंद्र कुमार यांनी अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,या संस्थेतून 'आंतरराष्ट्रीय आर्थिक विकास आणि प्रादेशिक नियोजन' या विषयात पीएचडी केली आहे.
तसेच आयआयटी दिल्ली इथून मॅनेजमेंट अँड सिस्टीम्समध्ये एम. टेक आणि कानपूर इथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. प्रभावी शैक्षणिक पार्श्वभूमी असण्यासोबतच ते एक उत्तम लेखकही आहेत. एका पुस्तकासह आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक शोधनिबंध तसेच तंत्रज्ञान आणि धोरणावरील त्यांचे लेख, अग्रगण्य वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.

