गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी- मनवाड- नरेवाडी रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. यामुळे गडहिंग्लजला जलद गतीने पोहोचण्यास हा मार्ग सोयीस्कर होणार आहे.
या रस्त्याचे अंतर किमान सहा किलोमीटर आहे. तेरणी- मनवाड रस्त्याकडे तेरणी गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेती आहे. रस्त्याअभावी शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होत होती. पावसाळ्यात रस्त्यात मोठ्या प्रमाणात चिखल होत होता. त्यामुळे ये- जा करणे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत होते. या भागातील शेतकरी तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. वारंवार पाठपुरावा केला होता. त्यामुळे या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून 3 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात खडीकरण करण्यात आले. आता रस्ता डांबरीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. तेरणी, मनवाड व नरेवाडी येथील नागरिकांना हा रस्ता सोयीचा होणार असून दळणवळण वाढणार आहे.
या रस्त्यामुळे नरेवाडी, मनवाड यासह या परिसरातील गावांच्या नागरिकांना तेरणीवरून व्हाया हत्तरकी मार्गे पुणे- बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग जवळचा होणार आहे. या परिसरातील शेतीमाल कोल्हापूर, बेळगाव बाजारपेठेत जलद गतीने पोहोचण्यास या रस्त्यामुळे मोठी मदत होणार आहे. तसेच तेरणी, कळविकट्टे येथील नागरिकांना गडहिंग्लजशी संपर्क साधण्यासाठी जवळचा मार्ग झाला आहे. आता डांबरीकरण झाल्याने या मार्गावर वाहतूक वाढली आहे.


