Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांना मुसक्या बांधून आणले पाहिजे

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विधिमंडळात कडाडले





मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती अत्यंत चुकीचे लिखाण करणारा अजूनही मोकाट आहे. सरकारने असे विकृत लिखाण करणाऱ्या गुन्हेगाराला मुसक्या बांधून आणले पाहिजे आणि रस्त्यावरून फिरवले पाहिजे, सरकार हे कधी करणार आहे? असा संतापजनक सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात उपस्थित केला.



क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विकृत लिखाण करणाऱ्या गुन्हेगाराच्या संदर्भांने आज सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला, मात्र त्यावरील सरकारच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधी पक्षाने सरकारला अक्षरशः घेरले. संतापलेल्या बाळासाहेब थोरात यांनी सरकारच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला, गोंधळानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.



थोरात म्हणाले, ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भाने अत्यंत चुकीचे आणि विकृत लेखन करणारा गुन्हेगार मोकाट आहे. सरकार या सगळ्या संदर्भात शांत कसे असू शकते. कारवाई करू असे म्हणून भागणार नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज आपण कडक कारवाई केली नाही तर उद्या महापुरुषांच्या बदनामीचे लोन पसरू शकते. सरकारने क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या गुन्हेगाराला शोधून त्याच्या मुसक्या बांधून आणलं पाहिजे, भर रस्त्यात त्याची धिंड काढली पाहिजे म्हणजे पुन्हा कोणाची असे करण्याची हिंमत होणार नाही.



थोरात पुढे असेही म्हणाले, ‘सत्य बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यासाठी आपण दोन वर्षांची शिक्षा करतात आणि दुसरीकडे विकृत गुन्हेगार मोकाट फिरतात. हा कसला न्याय?‘


दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर बोलताना, आमच्याही भावना तुमच्यासारख्याच आहेत. गुन्हेगाराला चौकात फाशी दिली पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत मात्र कायद्याने यात कारवाई करावी लागेल. आम्ही ट्विटर इंडियाशी बोलून गुन्हेगाराचा छडा लावू.‘ 


या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. ठोस कारवाईची मागणी विरोधकांनी केली होती. गोंधळाची परिस्थिती झाली आणि सरकारने बोलू न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.