गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी संतोष नारायण पाटील यांच्या 'मुलुख' या कथेने नागपूरच्या आकांक्षा प्रकाशनच्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविले. ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या समारंभामध्ये स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती आकांक्षा प्रकाशनच्या संचालिका अरुणा सबाने यांनी दिली आहे.
संतोष नारायण पाटील यांचे 'अघटीत' (गुढकथासंग्रह), शर्यत (ग्रामीणकथासंग्रह),'फिनिक्स' (कवितासंग्रह) हे लेखन साहित्य प्रकाशित झाले आहे. तर 'चांगभलं' (ग्रामीण कथासंग्रह), 'प्रारब्ध', 'पेईगगेस्ट', (गुढकथासंग्रह), 'तिन्हीसांजा'(कवितासंग्रह) हे लेखन साहित्य प्रकाशनाच्या मार्गावर आहे. यापूर्वी त्यांना उत्कृष्ठ राज्यस्तरीय कवितासंग्रह, साहित्य गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय कथासंग्रह पुरस्कार तसेच सा.रे. पाटील कथास्पर्धा, मैत्र जीवांचे ट्रस्ट मुंबई, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, झोका इन्काटेमेंट मुंबई यांसह अनेक नामवंत संस्थांचे कथा पुरस्कार पटकाविले आहेत. त्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन मार्गदर्शन लाभले आहे.

