गटविकास अधिकारी शरद मगर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
महागावात 'एकाग्रता' च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
भविष्यात होर्च्युअल क्लासरूमची निर्मिती : आयकर आयुक्त मल्लिकार्जुन उत्तुरे
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाबरोबरच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडविण्यासाठी आरोग्याकडे देखील लक्ष द्यावे. त्याच बरोबर विविध छंद देखील जोपासावेत जेणेकरून भविष्यात ते उपयोगी पडू शकतील. असा सल्ला गडहिंग्लज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद मगर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
महागाव येथील सुमित्रा प्रतिष्ठान संचलित एकाग्रता अभ्यासिका व करियर गाईडस सेंटर यांच्यावतीने आयोजित १० व १२ बोर्ड परीक्षेतील गणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आयकर आयुक्त मल्लिकार्जुन उत्तुरे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी श्री. मगर पुढे म्हणाले, दहावी व बारावीनंतर विद्यार्थी गोंधळून जातात. आपल्याला पुढे काय करायचे आहे याची दिशा निश्चित करताना त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होते. त्यामुळे गोंधळून न जाता मनाची एकाग्रता ठेवून योग्य दिशेची निवड करावी. शाखा निवडताना आपल्याकडे बी प्लॅन तयार असला पाहिजे जेणेकरून त्या माध्यमातून भविष्यात आपल्याला करिअर करता येईल. शिक्षण घेत असताना आपले शरीर व मन चांगले राहण्यासाठी दररोज व्यायामाची सवय लावली पाहिजे.
सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थ्यांमध्ये पुस्तके वाचनाची गोडी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाचा छंद जोपासणे आवश्यक आहे. आई वडील व शिक्षकांवर डोळे झाकून विश्वास ठेवा, त्यांचे अनुभव व मार्गदर्शन निश्चितच तुम्हाला यशापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. असे गट विकास अधिकारी श्री मगर यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेतून यश मिळावे यासाठी महागाव सारख्या ठिकाणी अभ्यासिका सुरू करून आयकर आयुक्त मल्लिकार्जुन उत्तुरे यांनी विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम केले आहे, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. या अभ्यासिकेचा लाभ विद्यार्थ्यांनी पुरेपूर घ्यावा असे आवाहनही श्री. मगर यांनी केले.
भविष्यात होर्च्युअल क्लासरूमची निर्मिती : आयकर आयुक्त मल्लिकार्जुन उत्तुरे
आयकर आयुक्त मल्लिकार्जुन उत्तुरे म्हणाले, भविष्यात होर्च्युअल क्लासरूमची निर्मिती करून जास्तीत जास्त अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.या अभ्यासिकेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन स्वतःला समृद्ध करावे. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक वापर टाळावा असाही सल्ला त्यांनी दिला.
यावेळी वरद तेली, वेदांत जाधव, प्रकाश चौगुले, संजय केसरकर, सुकेशिनी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास पंचायत समितीचे विस्तार अधिकार राजन दड्डीकर, संदेश कोकितकर, संदिप कोकितकर, संजय तेली, ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार यांच्यासह अभ्यासिकेचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत आयुर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी प्रेमकुमार नाईक यांनी तर प्रास्ताविक अक्षता कुपटे हिने केले. सुत्रसंचालन सृष्टी पडाळकर यांनी केले. अनिल आर्दाळकर यांनी आभार मानले.







