धरणग्रस्तांच्या आक्रमक पवित्र्यामुळे यंत्रणेची तारांबळ
प्रशासन व पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित
दहा ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा
आजरा : आंबेओहोळ धरणग्रस्तांनी भरपाईच्या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आक्रमक पवित्रा घेत धरणस्थळावर जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी धरणाच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांना रोखले. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी भ्रमणध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. येत्या महिन्याभरात न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा धरणग्रस्तांनी प्रशासनाला दिला.
आपल्या विविध मागण्यांसाठी आंबेओहोळ धरणग्रस्तांनी १० जुलै जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा धरणग्रस्तांनी यापूर्वीच प्रशासनाला दिला होता. या पार्श्वभूमीवर आज धरणग्रस्त आक्रमक होत आंदोलन करण्यासाठी पाण्याच्या दिशेने निघाले होते मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे धरणग्रस्तांना पुढे जाता आले नाही. जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने धरणस्थळ प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बोटीसह अग्निशमन दलाचे जवान देखील तैनात करण्यात आले होते.
गनिमी काव्याने आंदोलक पाण्याच्या दिशेने जाऊ नये यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली होती. जलसमाधी आंदोलनावर ठाम राहत धरणग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेत पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची मोठी तारांबळा उडाली.
दरम्यान प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांनी धरणग्रस्तांशी चर्चा केली. दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी धरणग्रस्तांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत सकारात्मक चर्चा केली. येत्या महिन्याभरात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. १० ऑगस्टपर्यंत न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय धरणग्रस्तांनी घेतला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.







