तब्बल पन्नास वर्षापासून प्रलंबित दलित बांधवांच्या स्मशानभूमीचा प्रश्न काढला निकाली
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुगळी (गडहिंग्लज) येथे तब्बल पन्नास वर्षापासून प्रलंबित असलेला दलित समाजाचा स्मशानभूमीचा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी निकाली काढला. यामुळे येथील दलित बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. अर्धशतकापासून रखडलेला हा प्रश्न सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांच्या नेतृत्वाखाली सुटल्याने समाधान व्यक्त होत आहे. हा प्रश्न निकाली काढून 'मनावर घेतलं तर का नाही होणार'..! याची प्रचिती ग्रामपंचायतीने घडवली.
गावामध्ये दलित समाजास स्मशानभूमी नसल्याने मोठी अडचण निर्माण होत होती. एखादी व्यक्ती मयत झाल्यास अंत्यसंस्कार कोठे करायचा? हा प्रश्न दलित समाजाला वारंवार सतावत होता. दलित समाजाची ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील मोतीराम पाटील व मालवण पाटील यांनी ५० वर्षापूर्वी म्हणजेच १९७५ साली आपल्या हिस्यातील काही जमीन दलित समाजाला स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून दिली होती. मात्र त्यानंतर या जागेचा ताबा मिळण्यासाठी आणि स्मशानभूमीच्या विकासासाठी दलित समाज बांधवांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पन्नास वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता.
दलित बांधवांची ही समस्या लक्षात घेऊन सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घातले. सर्वप्रथम त्यांनी या जागेची मोजणी करून ताबा घेतला. त्यानंतर ग्रामपंचायत निधीतून या स्मशानभूमीच्या बाजूने तारेचे कुंपण घातले. या कामाचे उदघाटन हिरशुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे म्हणाले, स्मशानभूमीकडे येण्यास रस्त्याची अडचण असल्याने पर्यायी जागेची पाहणी करून तेथे नवीन स्मशानभूमी करण्याचे मानस आहे. याकामी दलित समाजबांधव, पाटील, धुळाज व हुल्लोळी या कुटुंबाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच बसवराज धनवडे, संतोष भोसले, चंद्रकांत माने, डी पी पाटील, गुराप्पा कांबळे, जयापा भोसले, निरंजन पाटील, विद्याधर भोसले, विलास कांबळे, शिवगोंडा पाटील, प्रवीण धूळाज, संजय कांबळे, आशिष कांबळे व समाजबांधव उपस्थित होते.

