बहुजन मुक्ती पार्टीचा इशारा ; आगार प्रमुखांना दिले निवेदन
आजरा : आजरा तालुक्यातील पश्चिम भागात डोंगरामध्ये वसलेल्या लिंगवाडी येथे कित्येक वर्षे एसटीची सुविधा नसल्याने तेथील नागरिक एसटी सेवेपासून आजही वंचित राहिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी बस सुरु करावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आजरा एसटी आगार प्रमुखांकडे करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लिंगवाडी हे दुर्गम, अतिपावसाच्या तसेच डोंगरभागात वसलेले गाव आहे. गेली कित्येक वर्षे येथील नागरिक एसटी सेवेपासून वंचित राहिले आहेत. तेथील नागरिकांनी वारंवार एसटी बसची मागणी करूनदेखील आज तागायत एसटी सेवा पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील रुग्ण, विद्यार्थी, वयोवृद्ध तसेच गर्भवती मातांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागात वन्य प्राण्यांचाही वावर जास्त असल्याने त्यांच्या जिवितास देखील हानी पोहचण्याचा मोठा धोका असतो.
या गावातील नागरिकांना आजरा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय, वैद्यकीय तसेच शैक्षणिक कामासाठी आजरा शहरावरती अवलंबून रहावे लागते. त्याचप्रमाणे दुर्गम भाग असल्याने येथील लोकांची आर्थिक स्थितीही नाजूक असल्याने यांना एस टी वरच अवलंबून रहावे लागते. स्वमालकीची वाहने नसल्याने एसटी हाच पर्याय आहे. त्यामुळे त्यांच्या या होणाऱ्या गैरसोयीकडे गांभीर्याने लक्ष देऊन एसटीच्या फेऱ्या सुरु कराव्यात अशी मागणी केली आहे. अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष किरण के. के, डॉ. उल्हास त्रिरत्ने, विजय कांबळे, अमित सुळेकर, शामराव कांबळे, विष्णुपंत कांबळे, पांडू कांबळे, शिवाजी भादवणकर, हर्षद लोंढे, वसंत राजे, बबन कांबळे, अरविंद लोखंडे आदींच्या सह्या आहेत.

.jpg)
.jpg)