Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे

राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांच्या सूचना


 



मुंबई :  वारकऱ्यांसाठी वारी मार्गात कायमस्वरूपी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. याचबरोबर आजपासून सुरू होणाऱ्या आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होणार आहेत. त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यांसह विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, स्वच्छता, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.


निर्मल भवन येथे आषाढी वारीनिमित्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस दूरदृष्टी प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त तसेच पुणे, सोलापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.


राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी व पुरेसे टँकर उपलब्ध करुन द्यावेत. तसेच सर्व पाण्याचे स्रोत निर्जंतुकीकरण करण्यात यावेत.महिलांसाठी हिरकणी कक्षांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना यासंदर्भात सूचना द्याव्यात. तसेच वारी काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून ही वारी "स्वच्छ वारी, सुरक्षित वारी, भक्तीमय वारी" बनवावी, असे आवाहनही राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी केले.


वारी मार्गावर आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात यावे, औषधसाठा मुबलक ठेवावा व रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत. काही ठिकाणी कोविड रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाने सतर्क राहावे, योग्य तपासणी व खबरदारी घ्यावी. ऊर्जा विभागाने वीजवाहित तारांचे व्यवस्थापन योग्यरित्या करावे, अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी. यावर्षी अधिक पावसाची शक्यता असल्याने जलरोधक मंडप, जर्मन हॅंगरची व्यवस्था केली जावी. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस आणि प्रशासनाने समन्वयाने कार्य करावे. मोबाईल नेटवर्क व्यवस्थित राहावे यासाठी संबंधित कंपन्यांना सूचना पाठविण्यात याव्यात, असे त्यांनी यावेळी सूचित केले.


राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले की, “वारकरी ही आपल्या श्रद्धेची शिदोरी घेऊन पंढरपूरकडे चालत येतात. त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू देऊ नये, हीच आपली जबाबदारी आहे.”


या बैठकीला संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.