रिपब्लिकन सेनेची मागणी ; तहसीलदारांना निवेदन
आजरा (हसन तकीलदार ) : यावर्षी साधारणपणे मे महिन्यापासूनच पावसाचे प्रमाण सतत व जास्त असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तरवे, टोकण, ल्हवे पेरली होती ते कुजण्याचे प्रमाण जास्त झाले. जून महिन्यातच तालुक्यातील ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहू लागली आहेत. नदी -नाल्याकाठाच्या ऊसाच्या शेतात पाणी साचून राहिल्यामुळे ऊस पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन आजरा तहसीलदार यांना रिपब्लिकन सेनेने दिले आहे.
सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले आणि वेळेआधीच शेतवडीत उगळ सूरु झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत. आणि ज्या पेरण्या केल्या होत्या त्या अतिपावसामुळे खराब झाल्या आहेत. ज्यांची तरवे, मळका, सोया, भुईमूग पावसामुळे खराब झाले त्यांनी दुबार पेरण्या करूनसुद्धा सततच्या पावसामुळे तेही खराब होऊन बियाणे कुजून जात आहेत. भात, नाचणा, ऊस यासारखी उगवलेली पिके अतिपावसामुळे खराब होऊन गेली आहेत. त्यामुळे आजरा तालुक्यातील शेतकरीवर्ग हवालदिल झालेला असून आजरा तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी तसेच त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाकडे शिफारस करावी असे निवेदन तहसीलदार समीर माने यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
या निवेदनावर विजय कांबळे (तालुका अध्यक्ष रीपब्लिकन सेना), गोपाळ होण्याळकर (तालुका उपाध्यक्ष ), सुरेश दिवेकर (जिल्हा उपाध्यक्ष ), परशुराम कांबळे (संपर्क प्रमुख ), नंदकुमार कांबळे (तालुका महासचिव ), अविनाश कांबळे (युवाध्यक्ष ), मधुकर कांबळे (युवा उपाध्यक्ष ), शामराव कांबळे आदींच्या सह्या आहेत.

