चंदगड (प्रतिनिधी): शेतकरी कर्ज माफी, दिव्यांग, निराधार पेन्शन, अतिवृष्टी नुकसान भरपाई, बेळगांव-वेंगुर्ला राज्यमार्ग नवीन करणे यासाठी चंदगड येथे ठाकरे शिवसेनेने भिक मांगो आंदोलन करत याकडे शासनाचे लक्ष वेधले. कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात तहसीलदारांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, राज्यातील सत्ता असणाऱ्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध आश्वासने दिली होती. पण निवडणूक होवून अनेक महिने झाले तरी सदर आश्वासनांची पुर्तता झाली नाही. त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफी करून सातबारा कोरा करणार असे अश्वासन दिले होते. अजुनही शेतकरी कर्जमाफी झाली नाही. तसेच दिव्यांग व निराधार पेन्शन योजना, अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम, लाडक्या बहिणींची रक्कम वेळेत न मिळणे व चंदगड तालुका हद्दीतील बेळगांव-वेंगुर्ला राज्यमार्ग प्रवासासाठी अत्यंत धोकादायक झाला आहे तो नविन करणे आदी कामांसाठी शासनाकडे पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही पक्षाच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ भिक मांगो आंदोलन करीत आहोत.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, आजरा तालुका प्रमुख युवराज पवार, विष्णू गावडे, जिल्हा महिला संघटिका शांता जाधव, तालुका संघटक विक्रम मुतकेकर, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, वाहतूक सेना तालुकाप्रमुख महेश पाटील, ॲड. स्नेहल पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





