Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सर्व शासकीय कार्यालयांमधील कामकाज ई-ऑफिसवर आणा – जिल्हाधिकारी

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात २०० अर्ज दाखल




कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना दैनंदिन कामकाज ई-ऑफिस प्रणालीवर अनिवार्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. प्रत्येक कार्यालयाने यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेने ई-ऑफिस प्रणाली सुरू केली असून, जिल्ह्यातील सर्व कार्यालयांनी गतिमान कामकाजासाठी याचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या लोकशाही दिनात एकूण २०० अर्ज दाखल झाले, यापैकी ७० अर्ज महसूल विभागाचे, तर १३० अर्ज इतर विभागांचे आहेत. यामध्ये प्रामुख्याने ३० अर्ज जिल्हा परिषदेचे आणि १८ अर्ज पोलीस विभागाचे आहेत. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख आणि अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



लोकशाही दिनी प्राप्त अर्जांवर त्याच दिवशी कार्यवाहीला सुरुवात झाली. प्रत्येक विभागाला आलेल्या अर्जांच्या प्रती तात्काळ देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित विभागप्रमुखांना कामकाजासंदर्भात सूचनाही दिल्या. ते म्हणाले, पुढील लोकशाही दिनापूर्वी, म्हणजेच एका महिन्याच्या आत, संबंधित अर्जदारांना अनुपालन अहवाल द्यावा. अर्जदारांना वारंवार लोकशाही दिनात अर्ज देण्याची आवश्यकता पडू देऊ नका. प्रत्येक अनुपालन विभागप्रमुखांनी पडताळून गुणवत्तापूर्ण द्यावे. शासनाच्या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमातील सूचनांनुसार कामे करावीत. ई-ऑफिस, ई-गव्हर्नन्स आणि संकेतस्थळ यांसाठी कार्यालयातील जबाबदार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे. अनुकंपावरील नियुक्त्या १७ सटेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात. अर्जदाराच्या संमतीने यापुढे अनुपालन अहवाल व्हॉट्सअॅपवर पाठवले जातील. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातील डॅशबोर्डवर सर्व विभागांनी उपक्रमाची माहिती भरण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उर्वरित १५ दिवसांत उत्कृष्ट कामगिरी करावी, असेही ते म्हणाले.



सिद्धगिरी कणेरी मठ निर्मित निसर्गपूर्वक गोमय गणेशमूर्ती जिल्हाधिकाऱ्यांना भेट



या बैठकीदरम्यान, पूर्णपणे पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून आणि नैसर्गिक रंगांपासून तयार केलेल्या, पूर्णपणे विरघळणाऱ्या सिद्धगिरी कणेरी मठ निर्मित गोमय गणेशमूर्ती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना सस्नेह भेट देण्यात आल्या. यावेळी मठाचे विक्रम पाटील, महेश मस्तोळी आणि महादेव शिर्के यांच्या हस्ते या मूर्ती प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पद्माकर कापसे, राजेंद्र मकोटे, अभिजित पाटील, अशोक चौगुले आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.