Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यात ठाकरे शिवसेनेच्या वतीने तबला, मृदंग वादन स्पर्धा ; उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक



आजरा (हसन तकीलदार) : आजरा शिवसेना (उबाठा )व सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत दालनात भव्य तबला व मृदंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खास गणेशोत्सवानिमित्य या स्पर्धेचे आयोजन करून भारतीय परंपरेला जपण्याचे काम शिवसेना उबाठाने केले आहे. या स्पर्धेच्या उदघाटनासाठी तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती लावली होती.



कोणत्याही चांगल्या आणि सामाजिक कार्यासाठी गट तट विसरून सर्व पक्षीय नेते एकत्र येतात हे आजरा तालुक्याची खासियत म्हटले तर वावगे ठरणार नाही हेच या कार्यक्रमावरून दिसून आले. यावेळी सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.



यावेळी जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर डी जे किंवा इतर  कार्यक्रमापेक्षा मृदंग तबला वादन सारखे पारंपरिक कार्यक्रम आयोजित करणे ही संकल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे. अशाच प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करून भावी कलाकार तयार करणे गरजेचे आहे. या व्यासपीठावर सर्व पक्ष एकत्र येतात ते या सगळ्या चांगल्या आणि विधायक कार्यासाठी. सर्वजण पक्ष, गट तट विसरून एकत्र येतात हेच तालुक्याचे वैशिष्ट म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशोकआण्णा चराटी म्हणाले की, स्तुत्य व चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद मानतो. बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्रसन्नता वाटली. मुकुंददादा देसाई म्हणाले की, आजच्या युगात ही कला लोप पावते की काय असा प्रश्न निर्माण होतो. डी जे च्या जमान्यात तबला व मृदंग वादन कार्यक्रम हा अतिशय स्तुत्य आणि अनुकरणीय कार्यक्रम आहे. वारकरी सांप्रदाय सारख्या कार्यक्रमांचे सुद्धा उबाठाने या अगोदर आयोजन करून लोककलेला आणि भारतीय संस्कृतीला पुनर्जिवन देण्याचे काम केले आहे. विद्रूपस्वरूप कार्यक्रमांना फाटा देऊन या पारंपारिक आणि भारतीय संस्कृतीला जपण्याचे काम शिवसेना उबाठाने प्रामाणिकपणे केले आहे. याबरोबरच आजरा अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, अभिषेक शिंपी तसेच भाजपा उपजिल्हाप्रमुख सुधीर कुंभार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.



स्पर्धानंतर लगेचच स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. लहान गटात प्रथम क्रमांक- ऋत्विक पाटील, द्वितीय क्रमांक- आशितोष लोहार, तृतीय क्रमांक- वर्धन वाशीकर, चतुर्थ क्रमांक- आदित्य निवरेकर, पाचवा क्रमांक- करण धनवडे.



मोठ्या गटात प्रथम क्रमांक -करण कवठणकर, द्वितीय क्रमांक- उत्तम येडगे, तृतीय क्रमांक -धीरज पाताडे, चतुर्थ क्रमांक -निवृत्ती गजरे, पाचवा क्रमांक -अनिकेत मिटके यांनी पटकवला. यावेळी विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. पर्यवेक्षक म्हणून सोहम सुतार (हिरलगे)यांनी जबाबदारी पार पाडली तर संदीप कुंभार यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद भोपळे यांनी केले.



यावेळी आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, सुधीरभाऊ देसाई, संभाजी पाटील, अनिकेत चराटी, किरण कांबळे, सौ. अस्मिता जाधव, सौ. दर्शना दयानंद भोपळे, सौ. दीपाली कवठणकर, प्रभाकर कोरवी, संजयभाऊ सावंत, जी. एम. पाटील, अमित गुरव, संजयभाई सावंत (देऊळवाडी), समीर चांद, ओंकार मद्याळकर,दिनेश कांबळे (पेरणोली), नारायण कांबळे, दत्तात्रय धडाम, सुरेश पाटील, विवेक घोडके, आदिसह तबला- मृदंगप्रेमी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.