लिंगायत बांधवांच्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोरील बेमुदत साखळी उपोषणस्थळी भेट
कोल्हापूर (प्रतिनिधी): महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लिंगायत समाजातील विविध घटकांना आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश असताना, प्रत्यक्ष लाभ मिळताना निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्याची गरज आहे, जाचक अटी रद्द करून सर्व लिंगायत बांधवांना लाभ मिळावा, शासनाच्या योजना कागदावर न राहता त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशी भूमिका चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मांडली.
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ खुल्या प्रवर्गातील समाज बांधवांना मिळावा या प्रमुख मागणीसाठी लिंगायत बांधवांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. यावेळी स्वतः उपस्थित राहत चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी उपोषणाला पाठिंबा देत मार्गदर्शन केले.
आमदार पाटील म्हणाले, लिंगायत समाजाच्या प्रश्नांकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता, त्यामागील सामाजिक आणि आर्थिक वास्तव लक्षात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. लिंगायत बांधवांच्या प्रमुख मागण्यांचा पाठपुरावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मी स्वतः करेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित हजारो लिंगायत बांधवांना दिली. समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपोषण स्थळी युवक, उद्योजक, शेतकरी व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.




