Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कारगिल युद्धातील वीरांना राष्ट्राची आदरांजली

🔘कारगिल युद्धातील साहसी सुपुत्रांना शत-शत नमन : पंतप्रधान नरेंद्र मोदी

🔘संरक्षण मंत्री, संरक्षण राज्य मंत्री, संरक्षण सचिव आणि तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांनी नवी दिल्लीतील युद्ध स्मारकावर वाहिली आदरांजली

नवी दिल्ली (सौजन्य: पीआयबी):भारताच्या १९९९ मधील ऐतिहासिक विजयाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त आज  कारगिल युद्धातील शूरवीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हा दिवस दरवर्षी ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथे पुष्पहार अर्पण करून १९९९ च्या कारगिल युद्धात भारताचा विजय सुनिश्चित करणाऱ्या शहीद वीरांना आदरांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारीही उपस्थित होते.

राष्ट्रीय युद्ध स्मारक इथल्या अभ्यागतांसाठीच्या पुस्तिकेत राजनाथ सिंह यांनी आपला संदेश लिहिला. यात युद्धादरम्यान सशस्त्र दलाच्या जवानांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण केले. “सशस्त्र दलांनी केलेल्या बलिदानाबद्दल राष्ट्र सदैव ऋणी राहील. त्यांच्या स्मृती आपल्या हृदयात जून ठेवत,  स्वतःला उर्जा देत राहू आणि राष्ट्र उभारणीच्या मार्गावर पुढे जात राहू,” असे संरक्षण मंत्र्यांनी लिहिले.

पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धातील शूरवीरांना आदरांजली वाहिली. ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की,"कारगिल विजय दिवस भारतमातेच्या सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे प्रतिक आहे. याप्रसंगी, मातृभूमीच्या रक्षणासाठी पराक्रमाची पराकाष्ठा करणाऱ्या देशातील सर्व साहसी सपुत्रांना माझे  शत-शत नमन। जय हिंद!"

आपल्या ट्विट संदेशात संरक्षण मंत्र्यांनी शूरवीरांच्या शौर्याचे  कौतुक केले आहे. भारताच्या इतिहासातील अजरामर क्षण म्हणून ते कायमचे कोरले जातील असे म्हणाले.

द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकासह देशभरात कारगिल युद्धातील शहीद वीरांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  कारगिल युद्धादरम्यान भारतीय लष्कराच्या शूर सैनिकांनी, भारतीय वायुसेनेच्या मदतीने अनंत अडचणी, प्रतिकूल भूभाग आणि प्रतिकूल हवामानावर मात करून रणभूमीत उंचीचा फायदा असलेल्या ठिकाणावरील शत्रूवर विजय मिळवला.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.