नवी दिल्ली (सौजन्यः पीआयबी ): तुकडा तांदळाच्या निर्यात धोरणात दुरुस्ती करून केंद्र सरकारने देशांतर्गत अन्नसुरक्षा, कुक्कुटपालन आणि पशुखाद्यासाठी खाद्याची उपलब्धता यशस्वीपणे सुनिश्चित करत महागाई तसेच तांदळाच्या देशांतर्गत किंमती नियंत्रणात ठेवल्या आहेत.
देशातील कुक्कुटपालन उद्योग तसेच इतर जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरण्यासाठी आणि ईबीपी (इथेनॉल मिश्रण ) कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी तुकडा तांदळाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी या तांदळाच्या निर्यात धोरणात दुरुस्ती करण्यात आली आहे. तुकडा तांदळाची देशांतर्गत किंमत जी खुल्या बाजारात 16 रुपये प्रति किलो होती मात्र वाढलेल्या आंतरराष्ट्रीय किमतींमुळे निर्यात करण्यात आल्यामुळे राज्यांमध्ये त्याचा दर सुमारे 22 रुपये प्रति किलो वर गेला. पशु खाद्याच्या दरवाढीमुळे कुक्कुटपालन क्षेत्र आणि पशुपालन करणार्या शेतकर्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कारण त्यांच्या खाद्यासाठी सुमारे 60-65% खर्च तुकडा तांदळासाठी केला जातो. किंमती वाढल्या तर दूध, अंडी, मांस सारख्या पोल्ट्री उत्पादनांच्या किमतीवर त्याचा प्रभाव पडतो. परिणामी अन्नधान्य महागाई दर वाढतो.
भौगोलिक -राजकीय परिस्थितीमुळे तुकडा तांदळाच्या जागतिक मागणीत वाढ झाली असून पशुखाद्याशी संबंधित घटकांच्या किंमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. तुकडा तांदळाच्या निर्यातीत गेल्या 4 वर्षात 43 पटीने वाढ झाली आहे. 2018-19 मधील एप्रिल-ऑगस्ट कालावधीतील 0.41 लाख मेट्रिक टनच्या तुलनेत 2022 मध्ये 21.31 लाख मेट्रिक टन निर्यात झाली.
तुकडा तांदळाच्या निर्यातीचा हिस्सा 2019 मधील 1.34% च्या तुलनेत लक्षणीयरित्या वाढून 22.78% झाला आहे. 2018-19 ते 2021-22 दरम्यान तुकडा तांदळाच्या एकूण निर्यातीत 319% वाढ झाली आहे.
उकडा तांदूळ (HS CODE = 1006 30 10) आणि बासमती तांदूळ (HS CODE = 1006 30 20) संबंधित धोरणात सरकारने कोणतेही बदल केलेले नाहीत. भारताच्या एकूण तांदूळ निर्यातीत उकडा तांदूळ आणि बासमती तांदूळचा सुमारे 55% वाटा आहे. त्यामुळे शेतकर्यांना रास्त दर मिळणे सुरूच राहील आणि जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा लक्षणीय वाटा असल्यामुळे अवलंबित /असुरक्षित देशांसाठी उकडा तांदूळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल .सार्वजनिक वितरण व्यवस्थेची मागणी पूर्ण करण्यासाठी देशाने पुरेसा अतिरिक्त साठा राखून ठेवला आहे.
तांदळाच्या अतिरिक्त साठ्यामुळे, तांदळाच्या देशांतर्गत किमती या आंतरराष्ट्रीय बाजार आणि जिथे किमती तुलनेने जास्त आहेत अशा शेजारी देशांच्या तुलनेत नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे.

