काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नांदेड जिल्ह्यात हाती मशाल घेऊन सोमवारी रात्री नऊ वाजता एन्ट्री
नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या "भारत जोडो यात्रेचे" सोमवारी रात्री नऊ वाजता नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन झाले. यावेळी राहुल गांधी यांच्या समवेत हजारो कार्यकर्त्यांनी हाती मशाल घेऊन महाराष्ट्रात पाऊल ठेवले. राहुल गांधी हे 55 दिवस भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आले असून पाच जिल्ह्यांमध्ये 374 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.
नांदेड जिल्ह्यात भारत जोडो यात्रेचे आगमन झाल्यानंतर काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आगमन होताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वप्रथम देगलूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करत भारत जोडो यात्रेचा प्रारंभ केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या उपक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील स्वागत केले आहे. राहुल गांधी यांच्या समवेत दिनांक 10 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी होणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

