विद्यार्थ्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर : प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन मांगनुर तर्फ सावतवाडी येथे रोपाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले.या कार्यक्रमात प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना श्रमसंस्काराचे महत्व सांगून आजच्या घडीला संस्काराबरोबरच आपले करिअर स्पर्धा परीक्षेतून करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना व गुरुजनांना विसरू नये. त्यांच्या मार्गदर्शनाने आपले करिअर अधिक घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक मुल्यांची जोपासना विद्यार्थ्यांनी करावी असेही त्यांनी सांगितले.
प्रा.किसनराव कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ग्रामीण जीवन हे समृद्ध जीवन आहे. त्याची जाणीव व त्याची जोपासना करण्याची भावना आजच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजणे काळाची गरज आहे. म्हणून विद्यार्थ्यांचे श्रमसंस्कार शिबीर हे ग्रामीण भागात आयोजित करण्याचा मुख्य हेतू आहे. म्हणून शिवराज हे ग्रामीण भागातील अधिकारी घडविणारे महाविद्यालय आहे असा सर्वत्र लौकिक आहे असे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपसरपंच प्रकाश पाटील, तुकाराम शिंदे, भागोजी मोरे, रामकुमार सावंत, हायकोर्ट वकील आर.आर.शिंगटे, फायर ब्रिगेड ऑफिसर शामराव शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच सौ.शारुबाई चव्हाण, शाहीर सदानंद शिंदे यांच्यासह गावातील ग्रामस्थ, विविध संस्थाचे पदाधिकारी, तरुण मंडळे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एम.एस.घस्ती, प्रा.संजय कांबळे, यांच्यासह स्वयंसेवक-स्वयंसेविका उपस्थित होते. प्रा.स्वप्नील आर्दाळकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.गीतादेवी देसाई यांनी मानले.



