स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव राजेंद्र गड्यानावर यांची माहिती
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
गडहिंग्लज(प्रतिनिधी): गडहिंग्लज साखर कारखाना कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप वेळेवर होण्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी प्रादेशिक सहसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता गडहिंग्लज नगरपालिकेच्या शाहू सभागृहात हेमरस, अथर्व, इको केन आणि आजरा या चारही साखर कारखाना कार्यकारी संचालक व शेती अधिकारी आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव राजेंद्र गड्यानावर यांनी दिली आहे.
गडहिंग्लज साखर कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम काही तांत्रिक अडचणीमुळे अद्याप सुरु झालेला नाही. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या उसाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गेला नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. या उसाची उचल करून वेळेत गाळप करणे आवश्यक आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज साखर कारखाना कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप वेळेवर होण्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. गड्यानावर यांनी सांगितले.
गडहिंग्लज कारखाना कार्यक्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक ऊस उत्पादक शेतकरी यांच्या ऊस तोडीला प्राधान्य देऊन तात्काळ उचल करावी, ऊसतोड टोळी धारकांच्याकडून ऊस उत्पादकांच्याकडे ऊस तोडीकरिता पैशांची केली जाणारी मनमानी लुबाडणूक थांबावी यासाठी शासन व साखर कारखाना यांच्याकडून गांभीर्याने ठोस पावले उचलण्यात यावीत याबाबत चर्चा केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या उसाच्या उचली संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी, व्यथा मांडण्याकरिता तसेच आपल्या समस्यांच्या विषयी प्रश्न उपस्थित करून त्याची निर्गत लावण्याकरिता मोठ्या संख्येने गडहिंग्लज नगरपालिकेच्या शाहू सभागृहात बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव राजेंद्र गड्यानावर यांनी केले आहे.

