इचलकरंजी: ग्राहक संरक्षण कायदा २०१९ या सुधारित कायद्याने ग्राहकांना विविध प्रकारचे हक्क दिले असून या हक्कांच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांनी सदैव सतर्क राहणे गरजेचे आहे. व्यापारी, उत्पादक, विक्रेते व सेवा पुरवठादार यांनी दिलेल्या वस्तू अथवा सेवा या कायद्याचे अनुपालन करत नसतील, तर ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून सुसंवादातून असे प्रश्न सोडविण्याचे काम होत आहे, याकरिता ग्राहकांची जागृती महत्त्वाची आहे. असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर महानगरचे अध्यक्ष कमलाकर बुरांडे यांनी व्यक्त केले.
इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन, श्री लक्ष्मी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, यंत्रमागधारक संघटना समन्वय समिती व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात ग्राहक हक्क चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये "ग्राहक संरक्षण कायदा 2019 व संबंधित ग्राहक हक्क विषयक विविध तरतुदी" याबाबत मार्गदर्शन केले व ग्राहकांच्या विविध प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी आगामी काळात होणारी औद्योगिक, घरगुती, व्यापारी इ. सर्व प्रकारच्या ग्राहकांवरील संभाव्य वीज दरवाढ, वीज कंपन्यांचे खाजगीकरण व वीज ग्राहकांचे हक्क यासंदर्भात अनेक मुद्दे विषद केले. याप्रसंगी ग्राहक पंचायतीच्या सौ. वैदेही जोशी व विनायक वाळवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरवातीला इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी यांनी स्वागत केले. त्यानंतर श्री लक्ष्मी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश दाते यांनी प्रास्ताविक केले. जाविद मोमीन यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार राहुल सातपुते यांनी मानले.
याप्रसंगी पुंडलिकभाऊ जाधव, चंद्रकांत पाटील, विनय महाजन, दिपक राशीनकर, काशीनाथ जगदाळे, विजय जगताप, डि.एम.बिरादार, विश्वनाथ मेटे, विकास चौगुले, गजानन सुलतानपुरे, उल्हास लेले, सुनील मेटे, बंडोपंत लाड, रावसाहेब तांबे, जीवन बरगे, समीर गोवंडे, रोहन कुलकर्णी, संदीप चोडणकर, मुकुंद माळी, सुनील बारवाडे, सूरज दुबे यांच्यासह इंजिनिअरिंग व टेक्स्टाईल उद्योगातील अनेक उद्योजक व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


