गडहिंग्लज (प्रतिनिधी): शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील मकानदार वाडा येथे तुंबलेल्या गटारींची समस्या मनसेने लक्ष घातल्याने पालिकेने तातडीने स्वच्छ केल्या. त्यामुळे या भागातील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील श्री काळभैरी रोडवर मकानदार वाडा येथे गेले कित्येक दिवस गटारी तुंबल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत होता. दरम्यान, येथील रहिवाशी हबीबभाई मकानदार यांनी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधत ही समस्या त्यांच्यापुढे मांडली होती. या प्रश्नी श्री.चौगुले यांनी पालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत आज पालिकेने तात्काळ अग्निशमक वाहनाद्वारे या तुंबलेल्या गटारांची स्वच्छता करत गटारी मोकळ्या केल्या. तसेच उर्वरित तुटलेली गटार काढून नवीन गटारी व काँक्रीटचे काम येत्या दोन दिवसात करून देणार असल्याचे पालिकेने सांगितल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी सांगितले.

