गडहिंग्लज (प्रतिनिधी): हरळी खुर्द येथे शनिवारी आठवडी बाजाराचा प्रारंभ करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
आठवडी बाजाराचा प्रारंभ लोकनियुक्त सरपंच साधना ऐवाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसरपंच चंद्रकांत राजे, सेवा सोसायटी चेअरमन शशिकांत चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
२६ जानेवारी रोजी झालेल्या गावसभेत ग्रामस्थांकडून आठवडी बाजार सुरु करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर दर शनिवारी गावात आठवडी बाजार भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी गावातील लोकांना आठवडी बाजारासाठी गडहिंग्लज व महागाव याठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे वेळ व पैसाही खर्च होत होता. तसेच गडहिंग्लज व महागावला जाण्यासाठी गावातून एक ते दीड किमी अंतरापर्यंत बसस्टाॅप पर्यंत चालत जावे लागत होते. वयोवृद्ध, लहान मुले, आजारी लोकांना याचा त्रास होत होता. आता गावातच आठवडा बाजार सुरू झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. आठवडी बाजारात पालेभाज्या, फळभाज्या, किराणा, भांडी, मासे अशा प्रकारची दुकाने लावली होती.
यावेळी जयसिंग पाटील, सुरेश पाटील, भारती पाटील, वर्षा गुरव, प्रदीप ऐवाळे, दत्तात्रय ऐवाळे, महानंदा कानडे यांच्यासह ग्रामस्थ, आजी, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



