गडहिग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे व मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र गुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक डॉ.एस.डी.सावंत यांनी केले. मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र गुंडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये संत गाडगेबाबा यांनी समाजाच्या प्रबोधन कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्याकाळी त्यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व अन्य भ्रामक रूढींचे उच्चाटन करून लोकांमध्ये जनजागृती केली. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाच्यावतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु करण्यात आले आहे. त्याकाळी समाज फार मागासलेला होता. त्या समाजाला दिशा देण्याचे महान कार्य संत गाडगेबाबा यांनी केले. समाजाला विज्ञानाचे, स्वच्छतेचे त्याच बरोबर शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. आपल्या किर्तनातून संत गाडगेबाबांनी समाज घडविण्याचे कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संत गाडगेबाबांच्या दश:सूत्री सांगितली.
प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी नव्या पिढीने संत गाडगेबाबा यांच्या चरित्राचे वाचन करणे आवश्यक आहे, तसेच संत गाडगेबाबांच्या कार्याचा आदर्श घ्यावा. तसेच थोरांच्या चरित्रातून मिळणारी प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल सक्षमपणे करावे असे आवाहन केले. यावेळी फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष जाधव, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


