केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचे मत
कोल्हापूर : जीवन जगताना एकटा जगणे अवघड आहे हेच एकत्र जगलो तर खूप सोपे जाते, त्याप्रमाणे निसर्गाचे सुद्धा असेच आहे, पृथ्वीसुद्धा पंचमहाभूतांनी बनली आहे, यामध्ये पृथ्वी, आकाश, जल, अग्नी ,वायू हे सुरक्षित राहिले पाहिजेत तरच आपण पुढील आयुष्य सुरक्षित जगू. असे मत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.
ते कणेरी मठ येथे सुरू असलेल्या पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, आमदार मानसिंग नाईक ,आमदार महेश शिंदे, कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले, काडसिद्धेश्वर स्वामीजी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान पुढे म्हणाले, मनुष्याला एकटे जीवन जगणे मुश्कील असून सामुदायिक सर्वांनी जगले पाहिजे. समूहाची ताकद खूप मोठी असते. देश हितासाठी, देश रक्षणासाठी व प्रदूषण मुक्तीसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. याची सुरुवात कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केली असून ही संकल्पना संपूर्ण देशभर गाजेल. आपल्या हितासाठी आता सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये दिव्यता आहे, मग तो काळा असो अथवा गोरा स्त्री असो अथवा पुरुष सर्वांना दिव्यता व आत्मा एकच आहे. मनुष्यप्रमाणेच झाड, पक्षी, कीटक यांच्यामध्ये सुद्धा आत्मा असून यांचे सुद्धा रक्षण झाले पाहिजे. आपली भारतीय संस्कृती ही टिकली पाहिजे. आपली भारतीय संस्कृती ही इतर देशांपेक्षा नक्कीच वेगळे आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आजच्या कार्यक्रमाला कणेरी मठावर जवळपास चार ते पाच लाख लोकांनी हजेरी लावली होती. संपूर्ण मठ परिसर गर्दीने फुलून गेला होता.




