गडहिंग्लजला ठाकरे गट शिवसेनेचे वन अधिकाऱ्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): जंगलांना लागणाऱ्या वाढत्या आगीच्या घटना रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने गडहिंग्लज वन अधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. किल्ले सामानगडवरील जंगलाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर वन विभागाचे याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असणारा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सामानगड किल्ला आहे. या किल्ल्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जंगलामध्ये निलगिरी, जांभूळ, आंबा, सागवान यासह विविध प्रकारची झाडे त्याचबरोबर विविध वन्यजीवही आहेत. दरम्यान, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तब्बल तीन वेळा सामानगडावरील जंगलाला आग लागण्याच्या घटना घडल्या. या आगीत वृक्षसंपदेसह, गवत, वन्यजीव जळून खाक झाले. आगीच्या वाढत्या घटनांमुळे किल्ल्याचा परिसर भकास होत आहे. जंगलामध्ये जाळरेषा निश्चितीसह अन्य उपायोजना करून आगीच्या घटना रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत अशी मागणी या निवेदनातून वनविभागाकडे करण्यात आली आहे.
या निवेदनावर उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, युवा सेना विभाग प्रमुख तेजस घेवडे, प्रकाश पाटील, नानासाहेब कांबळे, शकील मुल्ला आदींच्या सह्या आहेत.

