गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात अर्थशास्र विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जी.जी.गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या अध्यक्षतेखाली व शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.जयकुमार सरतापे यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकताना डॉ.आंबेडकर यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कृषी, औद्योगिक, कायदा यांसह अनेक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच स्त्री व दलित उध्दार कार्य, शेतकर्यांसाठी व कामगारांसाठी केलेल्या कार्याबाबतही मार्गदर्शन केले. तसेच डॉ. आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच क्षेत्रात केलेले कार्य संपूर्ण जगाला आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आजच्या घडीला अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सुधीर मुंज, ग्रंथपाल संदीप कुराडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, रजिस्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार डॉ.वृषाली हेरेकर यांनी मानले.



