जनता दलाच्यावतीने दुय्यम निबंधकाना निवेदन

गडहिंग्लज : दुय्यम निबंधकांना निवेदन देताना जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांच्यासह इतर.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शासनाने मुद्रांक खरेदीची जाचक अट तातडीने रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनता दलाच्या वतीने तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांनी दुय्यम निबंधकांना निवेदनातून दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने १ एप्रिल पासून एका व्यक्तीस एकच मुद्रांक खरेदी करता येते अशी अट लागू केली आहे. या जाचक अटीचा फटका जनतेला बसत आहे. बऱ्याच वेळा बँकांसह विविध कामांसाठी एकापेक्षा अधिक मुद्रांकाची गरज भासते. ग्रामीण भागातून जनतेला मुद्रांक खरेदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. या ठिकाणी आल्यानंतर या नव्या नियमामुळे नागरिकांना एका ठिकाणी एकच मुद्रांक मिळते. जादाच्या मुद्रांकसाठी इतर मुद्रांक विक्रेत्याकडे जावे लागते. या जाचक अटीमुळे ग्रामीण भागातील जनतेला हेलपाटे मारावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मुद्रांक विक्रीतून शासनाला सर्वाधिक महसूल मिळतो. असे असताना देखील शासनाने जाचक अट लागू केली आहे. सदर अट रद्द करून तातडीने पूर्ववत मुद्रांक खरेदी-विक्रीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या निवेदनातून दिला आहे.
यावेळी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, रमेश पाटील, रोहन पाटील, रत्नाकर टोणपी, मारुती नाईक यांच्यासह इतर उपस्थित होते.
