आमदार गणपत गायकवाड यांचे ठाणे विभाग नियंत्रकांना पत्र
कल्याण : कोरोना कालावधीत बंद असलेली कल्याण ते चंदगड बस सेवा पूर्ववत सुरू करावी अशी सूचना कल्याण (पूर्व)चे आमदार गणपत गायकवाड यांनी ठाणे विभाग नियंत्रकांना पत्राद्वारे दिली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, कल्याण शहरात तसेच आजूबाजूच्या परिसरात कोल्हापूर, सातारा, चंदगड, कोकण या भागातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या नागरिकांना सणासुदीला, अडीअडचणीला गावी जाताना खासगी वाहतुकी शिवाय पर्याय नाही. सणासुदीला खासगी बस चालक जास्त प्रमाणात भाडे आकारणी करतात. ही जादा भाडे आकारणी सर्वसामान्य लोकांना परवडणारे नसते. कोरोना महामारी कालावधीच्या अगोदर चालू असलेली कल्याण आगार ते चंदगड आगार बस सेवा सुरू होती. परंतु कोरोना महामारी नंतर सदर बस सेवा ही बंद करण्यात आली ती अद्याप पर्यंत सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे या भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी कल्याण आगार ते चंदगड आगार अशी कोरोना कालावधीत बंद असलेली बससेवा पूर्ववत सुरू करावी अशी सूचना या पत्रातून केली आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर मोरेश्वर भोईर, शिवसह्याद्री प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सतीश पेडणेकर, अंबाबाई प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष गिरधर कुराडे, शिवसह्याद्री प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष संतोष पाटील यांनीही पाठपुरावा केला आहे. यावेळी शिवसह्याद्री प्रतिष्ठाण कल्याण विभाग पदाधिकारी उपस्थित होते.

