जम्मू काश्मीर : दरवर्षी ज्येष्ठ अष्टमीच्या दिवशी काश्मिरी पंडित माता रागनेया देवी म्हणजेच खीर भवानी मंदिराला भेट देवून मातेचे दर्शन घेतात. या वर्षी हा मेळावा 28 मे रोजी भरला होता. हा मेळावा काश्मिरी पंडितांनीच नाही तर काश्मीर खोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या स्थानिक लोकांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा केला.
या मेळाव्याविषयी आपल्या ट्विटमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, “काश्मीरमध्ये ज्येष्ठ अष्टमीला होणाऱ्या या खीर भवानी मेळ्याला काश्मिरी पंडित बंधू आणि भगिनींच्या आध्यात्मिक जीवनात पवित्र स्थान आहे. या मेळ्याला 25000 हून अधिक भाविक उपस्थित होते. खीर भवानी मेळा यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, जम्मू-काश्मीर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे मी अभिनंदन करतो. माता खीर भवानीची कृपा आपल्यावर सदैव राहो.”
मेळ्याला येणाऱ्या भाविकांना मुक्काम करण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा गंदरबल जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
28 मे रोजी सायंकाळी देवीमातेची पूजा आणि आरतीने मेळ्याची सांगता झाली. काश्मिरी पंडित आणि इतर स्थानिक समुदायांनी आपल्या प्रियजनांच्या आणि समाजाच्या शांती, समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना केली.
खीर भवानी ही काश्मिरी पंडितांची कुल देवता मानली जाते. काश्मीर भागात या देवीला भक्तिभावाने पूजले जाते. खीर भवानी मेळा हा काश्मीरमध्ये जातीय सलोखा- एकोपा आणि बंधुभावाचे प्रतीक बनला आहे.




