सरपंच शेवंता मगदूम, उपसरपंच तायगोंडा बोगरनाळ यांची माहिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): पाच वर्षानंतर लक्ष्मी देवीची यात्रा होत आहे. ९ मे पासून यात्रेला प्रारंभ झाला आहे. यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची खबरदारी ग्रामपंचायतीने घेतली असून यात्रेचे योग्य आणि नेटके नियोजन केले आहे. अशी माहिती सरपंच शेवंता मगदूम, उपसरपंच तायगोंडा बोगरनाळ यांनी दिली.
ते म्हणाले, यात्रा कालावधीत गावात स्वच्छतेसाठी विशेष नियोजन केले आहे. गाव निर्मल असल्याने कोणीही उघडयावर शौचास बसु नये म्हणून सक्त सूचना दिलेली आहे. तशी दवंडीच गावातून दिली आहे. वीज बचतीसाठी गावातील सर्व खांबावर कमी दाबाचे दिवे बसविले आहेत. गावात डिजिटल फलकांवर बंदी घालण्यात आली आहे. यात्रा कालावधीत दररोज दोनवेळा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामस्थांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी टँकरने देखील पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी ग्रामसेवक दत्ता पाटील यांचेही सहकार्य लाभत आहे.
यात्रेच्या पार्श्वभुमीवर खा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी जि. प. सदस्या रेखाताई हतरकी, पंचायत समितीच्या माजी सभापती रूपाली कांबळे, यांच्यामुळे गावातील विविध विकासकामासाठी भरघोस निधी मिळाला आहे. यामध्ये अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण, आरसीसी गटर बांधकाम, संरक्षक भिंत बांधकाम, दलित वस्ती योजनेतून गटर्स अशा कामांचा समावेश आहे.


