मनसेचे गडहिंग्लज नगरपालिकेला निवेदन

गडहिंग्लज : नगरपालिकेत निवेदन देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शहराध्यक्ष केप्पांना कोरी, उपशहराध्यक्ष राहुल जाधव, संदीप कुरबेट्टी आदी.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरालगतच्या ओढ्या- नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करावी तसेच अपघाताला कारणीभूत ठरणारी जीर्ण झालेली झाडे हटविण्यात यावित अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी नगरपालिकेकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहराच्या सभोवती ओढ्यांची संख्या अधिक आहे. शहरात प्रवेश करताना सर्व ठिकाणी प्रामुख्याने ओढ्यावरून मार्गक्रमण करावे लागते. पावसाळ्यापूर्वी या ओढ्यांची नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी साफसफाई न झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी नागरी वस्तीत घुसून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याची वेळ आली होती. याचबरोबर दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या ओढ्यांची साफसफाई करण्यात यावी.
त्याचबरोबर गडहिंग्लज शहराच्या प्रमुख मार्गावरील जीर्ण झालेली झाडे उन्मळून पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच भडगाव येथील युवकाला झाड अंगावर पडल्याने प्राण गमवावा लागला आहे. पावसाळ्यातील धोका लक्षात घेता शहरातील सर्व ओढ्या- नाल्यांची साफसफाई व जीर्ण झालेल्या वृक्षांचा सर्व्हे करून तात्काळ हटविण्यात यावीत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी शहराध्यक्ष केप्पांना कोरी, उपशहराध्यक्ष राहुल जाधव, संदीप कुरबेट्टी उपस्थित होते.
