संत गजानन 'आयुर्वेद' मध्ये व्याख्यान
केस गळणे, तुटणे किंवा अकाली पांढरे होणे या समस्यांवर सांगितले आयुर्वेदिक उपाय
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजकाल आपण जी जीवनशैली जगत आहोत ते पाहता बहुतेक आरोग्य समस्या आणि केस गळतीसाठी तणाव हा एक मोठा घटक बनलेला आहे. परिणामी केस गळणे, तुटणे किंवा अकाली पांढरे होणे या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी रासायनिक प्रसाधनाचा वापर अधिक होत असल्याने अनेक दुष्परिणामही होऊ लागला आहे ते टाळण्यासाठी आयुर्वेदातील हेअरकेअरला सध्या विशेष महत्त्व प्राप्त झाला आहे. आहारातील बदल आणि सवयी बदलल्यास आपला लुकही बदलेल असा सल्ला पुणे येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व केशायुर्वेदाचे संस्थापक वैद्य हरीश पाटणकर यांनी महागाव (ता.गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालयात आयोजित 'केश आयुर्वेद व कायायुर्वेद' या कार्यक्रमात व्यक्त केले.
वैद्य पाटणकर पुढे म्हणाले, आयुर्वेदाच्या संकल्पनेनुसार केसाची निर्मिती अस्थी धातूपासून म्हणजेच हाडापासून होते त्यामुळे ज्याचा शरीरामध्ये हाडाची पोषकता चांगली असेल त्याच्या शरीरामध्ये केसाची आरोग्य सुदृढ राहते, परंतु हेच जर एखाद्या रुग्णामध्ये पचन संस्था व्यवस्थित काम करीत नसेल तर त्याचा परिणाम हाडांवर होतो. शरीरातील कॅल्शियम, गंधक याचप्रमाणे इतर न्यूट्रिशियल व्हॅल्यूस कमी व्हायला सुरुवात होते. पर्यायाने आरोग्य बिघडते. सध्या वाढलेल्या रासायनिक प्रसाधनाच्या वापरामुळे त्वचारोगाला आमंत्रण मिळत आहे. आपली त्वचा व सुरक्षित ठेवून त्वचारोग टाळण्यासाठी नैसर्गिक प्रसाधनाचा वापर केला पाहिजे.
यावेळी प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे, डॉ.सारिका देवरे, डॉ.महेश पाटील, डॉ.प्रिती रावळ, डॉ.शर्मिली पाटील, डॉ.संगिता मनगुळे, डॉ.अस्मिता कांबळे, डॉ.शिल्पा शिंदे, डॉ.दिग्विजय पाटील सह विद्यार्थी उपस्थित होते. डॉ.माधव पटाडे यानी आभार मानले.




