मुगळी येथील म. गांधी वाचनालयात वाचन सप्ताह
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रंथ आणि पुस्तके ही मानवाला मिळालेली मौल्यवान देणगी आहे. आपले विचार प्रगल्भ करण्यासाठी वाचन गरजेचे आहे. कारण वाचनाने मने समृध्द होतात आणि समृध्द मनातून सदविचारांची निर्मिती होते. सद विचारातूनच देश बलशाली बनतो असे प्रतिपादन गडहिंग्लज तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अविनाश कुलकर्णी यांनी केले.
मुगळी येथील म. गांधी वाचनालयात आयोजित वाचन सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच बी. जी. स्वामी होते. यावेळी बोलताना श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले, वाचन करा असा उपदेश सगळेच देतात पण काय वाचावे, वाचनाची सुरवात कशी करावी हे कोणीच सांगत नाहीत. आजकाल मोबाईलच्या जमान्यात वाचताना कंटाळा येतो त्यामुळे विनोदी पुस्तकांपासून वाचनाची सुरवात करावी.
यावेळी दहावीतील अस्मिता मुसळे, संजना घस्ती समर्थ मुसळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. न्यू. इंग्लिश स्कूल मुगळीच्या मुख्याध्यापिका रंजना पाटील, बी. जी. स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापिका रंजना पाटील मुगळी हायस्कूलमध्ये रुजु झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वाचनाची गोडी लागावी म्हणून इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांना वाचनालयामध्ये मोफत वाचक सभासद करून त्यांना रीतसर पावत्या देण्यात आल्या.
कार्यक्रमास सुरसेन कांबळे, प्रशांत महाजन, स्मिता खडकेकर, प्रिंयका पोवार, अश्विनी धनवडे, के. डी.धनवडे, श्रीपाद स्वामी, यशवंत भोसले सुरेश मुसळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक ए. बी. जाधव यांनी केले. ईश्वर हुल्लोळी यांनी आभार मानले.




