मुंबई : केंद्र सरकार 'पीएम किसान सन्मान' योजनेतून तीन हप्त्यात सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देते त्याला अनुसरूनच राज्यातील शेतकऱ्यांना 'नमो शेतकरी सन्मान' योजनेतून लाभ मिळणार आहेत अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आजपर्यंत 'नमो शेतकरी सन्मान' योजनेत ८७ लाख शेतकरी ऑनलाईन लाभ घेतात अशी शेतकर्यांची आकडेवारी समोर आली आहे असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.
सुरुवातीला योजना जाहीर करताना काही त्रुटी राहतात त्या त्रुटीचा फायदा काहींनी उचलला असे दिसते असे स्पष्ट करतानाच 'पीएम किसान सन्मान' योजनेत लूट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्यातील वसुली केंद्र सरकारने केली आहे. अनेक शेतकऱ्यांकडून आजपर्यंत वसुली झाली आहे. त्यानंतर पीएम किसान सन्मान योजनेमध्ये लाभार्थी ठरवत असताना अनेक निकष बदलले. त्यात आधार लिंक झाले पाहिजे. ई केवायसी दिली पाहिजे. अनेक नियम व अटी लागू केल्या गेल्या आहेत. ऑनलाईन जरी अर्ज करत असलो तरी नियम अटी पूर्ण केल्याशिवाय अधिकृत सातबारा असणारा खातेदार शेतकरी त्यालाच या 'पीएम किसान सन्मान' योजना मिळाली पाहिजे असे केंद्र सरकारने ठरवले असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
केंद्र सरकारने जसे ठरवले आहे तसेच राज्य सरकारने मागील अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी खातेदार शेतकऱ्यांना 'नमो शेतकरी सन्मान' योजना जाहीर केली असेही धनंजय मुंडे म्हणाले.
पूर्वीचे १४ लाख शेतकरी आपल्याला बातमीतून दिसत आहेत यामध्ये खरा आकडा आहे की खोटा आकडा आहे याबाबत अधिकृतरित्या बोलू शकत नाही यावर केंद्र सरकार नियोजन करते त्यामुळे यावर आता सांगणे उचित ठरणार नाही असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

