मनसेने दिलेल्या निवेदनाची दखल
लाभार्थी शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चुकीची केवायसी भरल्यामुळे अपात्र ठरलेल्या हलकर्णी येथील १०० लाभार्थी शेतकरी प्रकरणाची दखल घेत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी तातडीने यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याबाबत लाभार्थी पात्र व अपात्रतेची खात्री करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदारांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले होते.
यासाठी मंडळ अधिकारी विजय कामत, कृषी पर्यवेक्षक विकास जोशीलकर, कृषी विस्तार अधिकारी सोमेश जज्जरवार, ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके, तलाठी वैजनाथ मुंगारे, कृषी सहाय्यक अमित शिंदे या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर काम जलद गतीने व अचुकरीत्या पूर्ण करून दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत.
चुकीची केवायसी भरल्यामुळे हलकर्णीतील शंभर शेतकरी पी एम किसान योजनेसाठी अपात्र ठरले होते. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, मनविसे जिल्हा अध्यक्ष प्रभात साबळे, तालुकाध्यक्ष शिवानंद मठपती, शहराध्यक्ष केंप्पाना कोरी याच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले होते. तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी तातडीने याची दखल घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे.
दरम्यान, बुधवारी हलकर्णी ग्रामपंचायत येथे पीएम किसान योजनेच्या यादीमध्ये चुकीच्या केवायसीमुळे अपात्र ठरलेल्या पात्र शेतकऱ्यांना मनसे तालुकाध्यक्ष शिवानंद मठपती यांनी स्वतः उपस्थित राहून फॉर्म भरून घेतले व पुढील कार्यवाही तात्काळ करण्याबाबत पात्र शेतकऱ्यांना आश्वासित केले. निवेदनाची दखल घेत तहसीलदार, अधिकार व कर्मचाऱ्यांनी कार्यवाही सुरू केल्याबद्दल मनसेच्या वतीने त्यांचे आभार मानत समाधान व्यक्त करण्यात आले.

