संकेश्वर - बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचा निर्णय
आजरा : आजरा तालुक्यातील खेडे-मडिलगे जवळील पूल बांधण्यास संमती देण्याचा निर्णय संकेश्वर - बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
खेडे (ता.आजरा) येथे हनुमान मंदिर मध्ये संकेश्वर -बांधा महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली. प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत ज्या शेतकऱ्यांचे घर बाधित होणार आहे त्याना निवाराशेड बांधून देणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यालगत असताना आतील जमिनीचा दर धरून निवाडा झाला त्यांचे दर बदलणे, मडिलगे येथील शेतकऱ्याचे हॉटेल- धाबा होता, ते बांधकाम विनंती करताच काढून घेतले. मात्र संबंधितांना मोबदला दिला नाही, तो दिला जाईल या सर्व आश्वासनाची पूर्तता करून काही त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत. या सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या अटीवर फक्त पुलाचे काम करण्याची परवानगी देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
कामाची पूर्तता न झाल्यास काम बंद केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. इतर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना दिलेल्या मोबदल्यापेक्षा संकेश्वर- बांदा महामार्ग बाधिताना कमी मोबदला दिला जात आहे. नवीन जीआर शासनाने केला आहे. त्यामुळे 20 टक्के कपात करण्याचा शासन निर्णय बदलावा लागणार आहे. त्यासाठी संघटना प्रतिनिधी पालकमंत्री यांना भेटणार आहेत. तसा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला संघटना अध्यक्ष शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे, दिगंबर होरंबळे, सागर भाटले, अनिल शिंदे, विलास गोडसे, गणपती येसने, लता मोरबाळे, अनिता भाटले, मंगल खोराटे, आप्पासो पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.



