महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांची ग्वाही
बसर्गे येथे नूल- हसुरचंपू, हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघाचा मेळावा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ बसर्गे (ता गडहिंग्लज) येथे नुल-हसूरचंपू व हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघाचा महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गावागावात प्रा. संजय मंडलिक यांच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली आहेत. यापुढे देखील विकासाची गंगा प्रत्येक गावागावात आणण्यासाठी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचे हात बळकट करून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन महायुतीच्या नेते मंडळींनी या मेळाव्यात मतदारांना केले.
यावेळी बोलताना प्रा. मंडलिक पुढे म्हणाले, विरोधक केवळ टीका करण्यात धन्यता मानत आहेत. विकास कामांवर ते काहीही बोलत नाहीत. हे जनतेला देखील माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचा विकास झपाट्याने झाला आहे. यापुढे देखील त्यांचे हात बळकट करून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावे असे आवाहन त्यांनी केले. गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी कर्नाटक बरोबर चर्चा करून प्रयत्न केले जातील अशी ग्वाही प्रा. मंडलिक यांनी यावेळी दिली.
आमदार राजेश पाटील म्हणाले, विविध नैसर्गिक आपत्ती काळात प्रा. मंडलिक यांनी मदत करत जनतेला आधार देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर विविध विकास कामांसाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला होता मात्र गरिबी हटली नाही. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी हटावचे काम करत सर्वसामान्यांना दिलासा दिला. देशातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य, विविध योजनांद्वारे आरोग्य सुरक्षा कवच प्राप्त करून दिले आहे. त्यांच्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकास कामे वेगाने करता आली.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, केंद्र व राज्य सरकार यांनी सर्व घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेतृत्वाची आज देशाला गरज आहे. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. चंदगड, कागल, भुदरगड मतदारसंघातून मोठे मताधिक्य प्रा. मंडलिक यांना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, सरपंच भारती रायमाने, जयश्री तेली, संग्रामसिंह कुपेकर, शिवाजीराव पाटील, अजित शिंदे, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्यास प्रकाशराव चव्हाण, हेमंत कोलेकर, सौ. अनिता चौगले, संतोष तेली, संजय संकपाळ, प्रकाश पत्ताडे, चंद्रशेखर पाटील, अभयकुमार देसाई, उदय देसाई, एल. टी. नवलाज, सौ. जयश्री तेली, सातगोंडा जिनानावर, युवा उद्योजक शिवकुमार संसद्धी, प्रसाद जोशी, नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे, महादेव साखरे, रघुनाथ पाटील, मार्तंड जरळी, हलकर्णीच्या सरपंच सौ. योगिता संगाज, महादेव साखरे, विकास मोकाशी, किरण पाटील, चंद्रकांत जांगणूरे यांच्यासह तालुक्यातील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. स्वागत माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी यांनी तर प्रास्ताविक जयसिंग चव्हाण यांनी केले.






