निवडणुकीवरील बहिष्काराच्या इशाऱ्यामुळे आंबेओहळग्रस्तांची प्रशासनाने घेतली दखल
बहिष्कार मागे घेण्याची तहसीलदार यांनी केली विनंती
आजरा : निवडणुकीनंतर पुनर्वसनाबाबत प्रश्न सोडविण्यासाठी बैठकीचे लेखी आश्वासन आंबेओहळ धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांना आजरा तहसीलदार समीर माने यांनी प्रशासनाच्या वतीने दिले. दरम्यान बहिष्कार मागे घेऊन लोकशाहीची मूल्ये जपावीत अशी विनंती लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी शिवाजी गुरव यांना फोन करून बातमी वाचल्याचे सांगून धरणग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली आहे.
तहसीलदार व प्रांताधिकारी यांचे लेखी हमीपत्र मिळाल्याने प्रशासनाचा व छत्रपती शाहू महाराजांचा आदर राखून लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर घातलेला बहिष्कार मागे घेण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीला सदू शिवणे, शंकर पुंडपळ ,बाबुराव नाईक, नामदेव पोटे, रोहिणी चौगुले यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते.

