गटारींना झाडाझुडपांचा विळखा, उकिरड्यांमुळे सांडपाण्याचा निचरा होईना
रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार बांधकामाची गरज
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तालुक्यातील तेरणी येथील जुन्या कळविकट्टे रोडवरील ग्रामस्थ विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत. येथील ग्रामस्थांच्या समस्या ग्रामपंचायतीने सोडाव्यात अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.
तेरणी येथे लघु पाटबंधारे तलाव झाल्यानंतर येथून कळविकट्टेकडे जाणारा रस्ता पाण्यात गेला आहे. त्यामुळे या रस्त्याला पर्यायी बुगडीकट्टी रस्त्यानजीक नवीन रस्ता करण्यात आला आहे. जुन्या कळविकट्टे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्वीपासून बऱ्याच ग्रामस्थांची घरे आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी नाहीत. उजव्या बाजूला असणारी गटारी ही केवळ बेळी यांच्या घरापर्यंत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्याचबरोबर झाडाझुडपांचा विळखा, कचरा वाढल्याने पाणी तुंबून राहत आहे. त्याचबरोबर या रस्त्याच्या बाजूला बांधण्यात आलेल्या शौचालयांची दुरवस्था झाली असून हे वापराविना आहेत. परिणामी या शौचालयांच्या टाक्यांमधील घाण पाणी देखील पावसाच्या पाण्यामध्ये मिसळत असल्याने येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थांना याचा त्रास होत आहे. गटारी लगतच उखिरडे असल्याने सांडपाणी पुढे सरकण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी हे पाणी बऱ्याचदा तुंबून राहते व रस्त्यावर येते. याचा त्रास आजूबाजूच्या ग्रामस्थांना होत आहे.
या भागातील गटारींची स्वच्छता व परिसराची साफसफाई करण्याची गरज आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंदिस्त गटारी बांधल्यास सांडपाण्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होण्यास मदत होईल, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीने येथील ग्रामस्थांच्या समस्येकडे लक्ष घालून लवकरात लवकर या समस्या सोडवाव्यात अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.




