प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष कॉ.शिवाजी गुरव यांचा सवाल
आजरा : आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. ओव्हर फ्लो झाल्याने पाणी सांडव्यातून वाहत आहे. प्रकल्प शंभर टक्के भरला असला तरी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शंभर टक्के झालेले नाही याचे दुःख प्रकल्पग्रस्तांना आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे देखील शंभर टक्के पुनर्वसन व्हावे अशी मागणी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी केली आहे.
कॉ. शिवाजी गुरव म्हणाले, यावर्षी थोडा कमी पण संततधार पाऊस पडत आहे. आंबेओहोळ धरण कधी भरणार? याची उत्सुकता नागरिकांना होती. आज (दिनांक 21) जुलै रोजी धरण शंभर टक्के भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. पण ज्या शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनी या प्रकल्पासाठी गेल्या त्यांना एका बाजूला धरण भरल्याचा आनंद तर आहेच परंतु गेल्या 24 वर्षात वाट पाहून सुद्धा पुनर्वसन होत नाही याचे मात्र दुःख आहे, अशी पुनर्वसन न झालेल्या शेतकऱ्यांची भावना आहे. आंबेओहळ संग्राम संघटना यांच्याशी शेतकरी आपली भावना व्यक्त करत आहेत.
धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या ते शेतकरी विकास सैनिक आहेत. सरकारने विकास सैनिकांच्या त्यागाचा विचार करून पुनर्वसन लवकरात लवकर करावे अशी मागणी कॉ. शिवाजी गुरव यांनी केली आहे.


