गडहिंग्लज येथे झालेल्या बैठकीत घेतला निर्णय
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील नदी काठावरील गावांना दरवर्षी पुराचा फटका बसत असून नदीमध्ये साचलेला गाळ याला कारणीभूत आहे. तातडीने गाळ काढून गडहिंग्लज तालुका पूरमुक्त करावा यासाठी हिरण्यकेशी नदी काठावरील पूरग्रस्त शेतकरी व कुटुंबाचा दिनांक 13 ऑगस्ट रोजी भव्य निर्धार मोर्चा काढण्याचा निर्णय आज गडहिंग्लज येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
२०१९ साली हिरण्यकेशी नदीला महापूर आला. या महापुरात अनेक गावे, घरे, शेती पाण्याखाली गेली, लाखो रूपायांच नुकसान झाले. त्यावेळी लोकांनी पूर येऊ नये यासाठी प्रचंड मोर्चा काढून प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करावी अशी मागणी केली होती. पण सरकारने ही मागणी गांभीर्याने घेतली नाही. त्यानंतर दोन तीन वेळा पूर आला पण शासन अजूनही दखल घेताना दिसत नाही. यावेळी पुन्हा पूर परिस्थिती तयार झाली. वित्त हानी झाली पण शेतपिकांचे मात्र पुराने नुकसान केले आहे.
येथुनपुढे पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतत पुराच्या भीतीखाली वावरावे लागणार आहे. त्यामुळे हिरण्यकेशी नदीपात्रातील गाळ काढण्याची मोहीम तातडीने हाती घेतली पाहिजे. याबरोबर पूर येऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना सरकारने हाती घेतली पाहिजे. हिरण्यकेशी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, तो वाहून नेणारे निचरा होणारे मार्ग यासर्वांचा अभ्यास होऊन कायमस्वरूपी ठोस उपाययोजना केली पाहिजे. यासाठी हिरण्यकेशी घटप्रभा खोऱ्याचा अभ्यास करणारी तज्ज्ञांची समिती गठीत करून तिने सुचविलेल्या उपाययोजना तातडीने हाती घेतल्या पाहिजेत.
यासंदर्भात विचार करण्यासाठी आज गडहिंग्लज विभागातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जनआंदोलन उभा करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला.
यावेळी अमर चव्हाण, कॉ संपत देसाई, संजय तरडेकर, विद्याधर गुरबे, अमृत शिंत्रे, शिवाजी माने, बाळगोंडा पाटील, प्रशांत देसाई, गुरुप्रसाद हत्ती, सतीश पाटील, शाहू मोकाशी, वसंत नाईक , चिदानंद अरलगुंडी, किरण जाधव, सचिन जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते


