संचालक डॉ. प्रमोद नाईक यांची 'दिलखुलास' व 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत
मुंबई : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील युवकांना चांगले करिअर घडविण्याची आणि व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने अलिकडच्या काळात कौशल्य विकास उपक्रमांवर विशेष भर दिला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच युवकांना चांगले करिअर आणि व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत विविध योजना आणि उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत राबविण्यात येणारे विविध प्रकारचे अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया,अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध रोजगाराच्या संधी अशा विविध विषयांवर संचालक डॉ. नाईक यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात माहिती दिली आहे.


