काल दुपारनंतर एसटीच्या फेऱ्या बंद झाल्याने प्रवाशी, विद्यार्थ्यांचे हाल
कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे या मागणीसह विविध मागण्यांसाठी कालपासून (मंगळवार दिनांक 3 ) एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने काल दुपारपासून एसटीच्या फेऱ्या थांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल झाले.
वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, प्रलंबित महागाई भत्ता, फरक देण्यात यावा, वार्षिक वेतन वाढीचा फरक द्यावा, चुकीची वेतनश्रेणीतील तफावत दूर करावी, एकसमान वेतन श्रेणी करण्यात यावी आदी मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 12 आगारातील एसटीचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने प्रवासी वाहतूक ठप्प झाले आहे. काल दुपारनंतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने एसटीची चाके थांबली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. गडहिंग्लज आगारातील कर्मचाऱ्यांना देखील काल दुपारपासून आंदोलनात सहभागी झाल्याने येथील वाहतूक व्यवस्था देखील दुपारनंतर ठप्प झाली. गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. शासनाने तातडीने यावर तोडगा काढून एसटी वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

