Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महिलांना वर्षाला ५०० रुपयात ६ सिलिंडर, २.५ लाख सरकारी रिक्त पदांची भरती, कंत्राटी भरती बंद, १०० युनिट मोफत वीज

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्रनामा’चे भव्य पत्रकार परिषदेत प्रकाशन


शेतकरी, महिला सुरक्षा व सक्षमीकरण, नवीन उद्योग धोरण, रस्ते, दिवसा वीज, तंटामुक्त गाव, नोकर भरती, शिष्यवृत्तीत वाढ, युवा आयोग बनवणार




मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहिरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील भव्य पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय कामे करणावर व पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. या महाराष्ट्रनामामध्ये महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात दिले जातील, महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणला जाईल. ३०० युनिट पर्यंत वीजवापर असणा-या ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज, नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर असेल. सरकारच्या विविध विभागातील रिक्त २.५ लाख जागा भरल्या जातील. एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती केली जाईल. सरकारी नोकऱ्यातील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार, सरकारी विभागातील जागांचा अनुषेश भरून काढणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेतल्या जातील. महाराष्ट्राच्या विकासासाठी कृषी, ग्रामविकास, उद्योग, रोजगार, शहरी विकास, जनकल्याण यावर आधारित आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्रनामा प्रकाशित करत आहोत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर बनवला जाईल. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे सरकार स्थापन करु तसेच २०३० पर्यंत समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प या जाहिरनाम्यातून केला आहे.




यावेळी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक मुंबईकडे आर्थिकदृष्या, रोजगारासाठी, उत्पादन, गुंतवणुकीच्या दृष्टीने अपेक्षेने पहातात. देशभरातून लोक मुंबईत स्वप्न घेऊन येतात व मुंबई त्यांना सामावून घेते, त्यांच्या स्वप्नांचा बळ देते. सामाजिक बदलातही महाराष्ट्र आघाडीवर असतो. महाराष्ट्राची निवडणूक फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकरी, तरुण, महिलांसाठी हे सरकार घालवणे गरजेचे आहे असे सांगून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा असे आवाहन केले.




काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा युती सरकारला दीड वर्षात शेतकऱ्यांची आठवण आली नाही पण आता त्यांना शेतकऱ्यांची आठवण आली असून कर्जमाफी करण्याच्या वल्गणा करु लागले आहेत. महागाई, बेरोजगारी, महिला, शेतकरी दिसले नाहीत आता त्यांना पराभव दिसत असल्याने त्यांना यांची आठवण झाली आहे. आता भाजपा युती सरकार खाली खेचण्याची वेळ आली असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने परिवर्तन करण्याचा मानस बनवला आहे.


शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र कधी कोणाचा गुलाम बनला नाही व बनणार नाही हा जाहिरनामा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारा आहे.


जाहिरनामा समितीच्या सदस्य खा. वंदना चव्हाण यांनी मविआच्या जाहिरनाम्याबद्दलची सविस्तर माहिती दिली. तर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आभार व्यक्त केले.




महाविकास आघाडीचा जाहीरनामा नरिमन पाईंट येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या प्रमुख उपस्थिती मविआतील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत,  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, खासदार अभिषेक मनु सिंघवी, AICC च्या मीडिया विभागाचे चेअरमन प्रविण खेरा, सचिव बी. एम. संदीप, वॉर रुम प्रभारी वामशी रेड्डी, काँग्रेस वर्किंग कमीटीचे सदस्य खा. डॉ. नासीर हुसेन, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.