शेतकऱ्यांचे ३ लाखापर्यंतचे कर्जमाफ, महिलांना ३००० रुपये महिना व मोफत बसप्रवास, बेरोजगारांना ४ हजार महिना भत्ता, कुटुंबाला २५ लाखांचा आरोग्य विमा
मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलातील महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमानी सभेत लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली. यात ५ गॅरंटीचा समावेश आहे. मविआची सत्ता आल्यास महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास, शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ, तसेच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना ५० हजार रु. प्रोत्साहन, जातनिहाय जनगणना व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न, कुटुंब रक्षण अंतर्गत २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत औषधे व बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत दिली जाईल.
या सभेला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, मुकुल वासनिक, समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


