एक सरळमार्गी तरुण अभियंता गमावल्याची तेरणीकरांनी व्यक्त केली दुःख भावना
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथील प्रगतशील शेतकरी व गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण देसाई (सरकार) यांचे चिरंजीव अभिलाष देसाई ( वय 28) यांचे आज बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
अभिलाष यांनी कर्नाटकातील हुबळी येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर बेंगळूर येथील एका कंपनीत ते नोकरीस होते. गेली दोन-तीन वर्षे झाली कंपनीकडून वर्क फ्रॉम होम मिळाल्याने ते बेळगाव येथून ते काम पाहत होते. दरम्यान, घरात जिन्यावरून उतरताना पाय घसरून पडल्याने त्यांना दुखापत झाली होती. त्यामुळे बेंगळूर येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आजाराचे नेमके निदान होत नसल्याने तेथून त्यांना बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असताना आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्यावर आज रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अभिलाष नोकरीच्या निमित्ताने बेंगळूर येथे कार्यरत असले तरी आपल्या तेरणी या मुळगावी नेहमी येत असत. शेतीची देखील त्यांना आवड होती. नेहमी हसतमुख, सरळ स्वभावी, नम्रता, साधी राहणी यामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. त्यांच्या निधनाने तेरणी गावावर शोककळा पसरली असून एक सरळ स्वभावी तरुण अभियंता गमावल्याची भावना तेरणी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

