गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात ग्राहक प्रबोधन शिबिर
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्राहक सजग झाला पाहिजे. ग्राहकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. जाहिरातींना फसू नका. ग्राहकांची होणारी आडवणूक थांबली पाहिजे. ग्राहकांना न्याय मिळाला पाहिजे, ग्राहक जागृत राहिले पाहिजे यासाठी संघटनेच्या माध्यमातून ग्राहक चळवळ आम्ही करीत आहोत. या चळवळीच्या माध्यमातून ग्राहक सजग झाला पाहिजे असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी. जे. पाटील यांनी केले.
गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालय वाणिज्य व राज्यशास्त्र विभाग व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्राहक प्रबोधन शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे होते. डॉ. महेश चौगुले यांनी स्वागत केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमचा हेतू स्पष्ट केला. या ग्राहक प्रबोधन शिबिरात मार्गदर्शन करताना श्री पाटील पुढे म्हणाले, ग्राहकांनी कष्टातुन मिळविलेल्या पैशातून चांगल्या गोष्टींचे चांगल्या वस्तूंच्या खरेदी व्हावी त्यांची बाजारात फसवणूक होऊ नये. ग्राहकांचे होणारी फसवणूक थांबावी यासाठी आमची संघटना सतत प्रयत्नशील राहते. बाजारात मुदत संपलेल्या वस्तू खरेदी करू नयेत. तसेच त्याची हानी ग्राहकांना होऊ नये यासाठी ग्राहक दक्ष राहिले पाहिजे असेही असेही बी.जे. पाटील यांनी सांगितले. ग्राहक संरक्षण कायदा 1986 ला प्रथमत: पारित झाला. त्यानंतर 2019 मध्ये या कायद्यात सुधारणा झाली असल्याचे सांगून आपल्या आपण सर्व देशाचे नागरिक आहोत. विद्यार्थी दशेतूनच आपण ग्राहक म्हणून जागरुक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सुधाकर भदरगे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संघटना ग्राहकांच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी कार्य करते. ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य आजही करीत आहे शेतकरी व्यापारी श्रमिक ग्राहक उद्योजक हे आमच्या ग्राहक पंचायत चळवळीचे पंचप्राण आहेत. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. संवाद, समन्वय आणि ग्राहक कल्याण हेच सूत्र मानून संघटना कार्य करीत आहे. यावेळी त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक चळवळी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणातून शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे यांनी ग्राहक प्रबोधन होणे काळाची गरज आहे. विद्यार्थी हा ग्राहकच आहे. विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे. आजच्या घडीला विद्यार्थ्यांचे प्रबोधन होणे काळाची गरज आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र समाजातील ग्राहकांना जागृत करत आहे. अशा प्रकारचे प्रबोधन शाळा महाविद्यालयात होणे गरजेचे आहे. त्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन प्रा. कुराडे यांनी दिले. या कार्यशाळेत राधानगरी तालुका अध्यक्ष संजय पारकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे रामकुमार सावंत यांनीही मार्गदर्शन केले.
या प्रबोधन शिबिरामध्ये आणि चळवळीच्या कार्याबाबत माहिती देणाऱ्या पोस्टर्स प्रदर्शनचे उदघाटन अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष श्री सुधाकर भदरगे यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पर्यवेक्षक प्रा.तानाजी.चौगुले, डॉ. दिपक खेडकर, प्रा. आझाद पटेल, प्रा. आर. डी. कमते, निळकंठ कुराडे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष बाळासो देसाई, उपाध्यक्ष डॉ. महादेव ढोकरे-पाटील, तानाजी कुराडे, सचिव श्री अनिल कलकुटकी, रोहिणीताई चौगुले, सौ रत्ना सुतार, श्री सुरेश वडराळे, आजरा तालुका अध्यक्ष श्री महादेव सुतार, काशिनाथ मोरे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा.स्वप्नील आर्दाळकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार तानाजी कुराडे यांनी मानले.





