शिवराज महाविद्यालयात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांना अभिवादन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या त्यागी कार्यातून बहुजनांना न्याय देण्याचे कार्य खऱ्या अर्थी झाले आहे. म्हणूनच कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे कर्ते समाजसुधारक होते. त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी मांडलेले विचार व दिलेले योगदान मोलाचे आहे. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाज परिवर्तनाचे महान असे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची ओळख सर्वाना होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ.रंगराव हेंडगे यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित कर्मवीर विठ्ठल रामजी पुण्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते. प्रारंभी कर्मवीर विठ्ठल रामजी यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी व्याख्यानामध्ये बोलताना डॉ. हेंडगे पुढे म्हणाले, असे समाजसुधारक सतत प्रयत्नशील राहिले म्हणून आधुनिक भारत खऱ्याअर्थी घडला असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण्याचे महान असे कार्य केले. अशा या थोर समाजसुधारकांनी आपल्या देशासाठी दिलेले अनमोल योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण आजच्या काळात होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून प्रा.किसनराव कुराडे यांनी समाजाला विधायक विचारधारा देणारे कर्मवीर विठ्ठल रामजी यांच्या कार्याचे स्मरण नव्या पिढीने केले पाहिजे. त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी केलेला त्याग हा खरोखर सर्वांना घेऊन पुढे जाणारा होता. समाजातील वंचितांना या प्रवाहात सामील करून त्यांचा उध्दार करणारे कार्य कर्मवीर शिंदे यांनी केले आहे. म्हणून त्यांच्या कार्याची आठवण आजही आमच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही जपली असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रम समन्वयक ग्रंथपाल संदीप कुराडे, डॉ. एस.डी.सावंत यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ.अशोक मोरमारे यांनी सूत्रसंचालन केले तर मराठी विभाग प्रमुख डॉ. मनमोहन राजे आभार मानले.

