धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांची माहिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या रखडलेल्या पुनर्वसनप्रश्नी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी बैठक घेण्याचे आश्वासन प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी दिल्याने आज पासून केले जाणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली आहे. सकाळी साडेअकरा वाजता गडहिंग्लज प्रांत कार्यालयात बैठक पार पडणार आहे.
आंबेओहोळ धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लावण्यासाठी बैठक बोलवा अन्यथा 4 फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा संग्राम संघटनेने दिला होता. दरम्यान, महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव गडहिंग्लज दौऱ्यावर आले होते, त्यावेळी प्रांताधिकारी व डॉ. बाबा आढाव यांची चर्चा झाली. तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी देखील निवेदनाच्या अनुषंगाने बैठक घेण्याच्या प्रांताधिकार्यांना सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांना लेखी पत्र देऊन दिनांक 12 रोजी बैठक घेण्याचे लेखी पत्र देत आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करून बैठकीची तयारी करत असल्याचे संग्राम संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दिनांक 12 फेब्रुवारीला बैठकीला येताना प्रकल्पग्रस्तांनी आपले पुनर्वसन कोणत्या प्रकारचे राहिले आहे त्याचे लेखी अर्ज तयार करून आणावेत असे आवाहन कॉ. शिवाजी गुरव यांनी केले आहे.

